Skip to main content

शांताबाईं शेळके यांच्या कविता अणि त्याची गाणी

*माज्या सारंगा, राजा सारंगा…*

*लता मंगेशकर*

कोळीगीतं गाताना आणि नंतर ऐकतानाही खूप मजा आली. किती वर्षं झाली या गीतांना… पण आजही ती कानावर पडली, तरी मन समुद्रात-कोळीवाड्यात भन्नाट फिरुन येतं.


शांताबाईंनी लिहिलेली आणि बाळने (हृदयनाथ मंगेशकर) संगीत दिलेली तीन कोळीगीतं मी गायले आहे. ही कोळीगीतं गाणं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. कारण ती गीतं लिहिताना शांताबाईंनी कोळी लहेजा शब्दांत नेमका पकडला होता, बाळने त्याच्या चालींमध्येही तो नेमका उतरवला होता, आता कसोटी माझी होती. तो लहजा गाताना मला नेमका पकडता आला नसता, तर सगळी मेहनत फुकट गेली असती... पण मला सांगायला आनंद होतो की, मी शांताबाई आणि बाळ दोघांनाही न्याय दिला. आजही जेव्हा मी ही गाणी ऐकते, तेव्हा माझ्याभोवती कोळीवाड्याचा, समुद्राचा आणि त्यात मासेमारीला गेलेल्या होड्यांचा माहौल उभा राहतो. मला खरंच कौतुक वाटतं शांताबाईंचं की त्यांनी कोळीवाड्यातली ही शब्दकळा कशी अचूक साध्य केली असेल? पण शेवटी शांताबाईच त्या, भाषाप्रभू होत्या. संस्कृत-मराठी भाषा त्यांना वश होत्या. मनातली एखादी भावना-विचार सांगायची खोटी, दुसऱ्या क्षणाला त्यांनी अलवार गीत पेश केलेलं असायचं. हुकमी नाणं होत्या, शांताबाई!

शांताबाई, म्हणजे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके. आमच्या मंगेशकर कुटुंबाशी त्यांची छान नाळ जुळलेली होती. डोईवरुन अंगभर पदर लपेटून घेतलेल्या शांताबाई घरी आल्या की सगळेच खूश व्हायचे. त्यांच्याकडे साहित्य-संस्कृतीविषयक माहितीचा एवढा साठा असायचा की, त्या बोलत राहायच्या आणि आम्ही ऐकत राह्यचो. आमच्या माईचाही त्यांच्यावर जीव होता. त्या जशा वागायला-बोलायला साध्या-सोप्या, तसंच त्यांचं गीतलेखन होतं. एवढं छान आणि नेमकं लिहायच्या की, त्या गीतातले भाव लगेच मनात उमटायचे. आता हे कोळीगीतच बघा ना-

मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा

घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !

आयबापाची लाराची लेक, मी लारी

चोली पीवली गो नेसलंय अंजिरी सारी

माज्या केसान गो मालीला फुलैला चा चाफा

वास परमालता वार्‍यानं घेतंय झेपा…

किती नेमकी शब्दरचना आणि तीही कोळ्यांच्याच भाषेत! कोळीवाड्यात तोऱ्यात मिरवणाऱ्या मुलीचं चित्रं डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहतं. हेमंतकुमार यांच्याबरोबर हे गाणं गाताना मजा आली होती. असं वाटत होतं की भर समुद्रात नाव लोटलेली आहे आणि आम्ही गातोय... बेधुंद-बेभान होऊन.

शांताबाईंनी लिहिलेली आणि मी गायलेली चित्रपटगीतं खूप आहेत. परंतु स्वतंत्रपणे आम्ही एकत्र खूपच कमी काम केलंय- 'गजानना श्रीगणराया, आधी वंदू तुज मोरया' आणि 'गणराज रंगी नाचतो' ही दोन गणपतीची गाणी आणि तीन कोळीगीतं, एवढंच! गणपतीची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. परंतु मला शांताबाईंनी लिहिलेली कोळीगीतं विशेष भावली. एक वेगळंच जग त्यांनी माझ्यासमोर उभं केलं. जे माझं नसताना, माझ्याही नकळत माझं होऊन गेलं. महत्त्वाचं म्हणजे ही म्हणायला कोळीगीतं आहेत, परंतु त्यातला आशय भावगीतांचा आहे. आज उडत्या चालीची अनेक कोळीगीतं लोकप्रिय आहेत. परंतु शांताबाईंनी लिहिलेल्या आणि बाळने संगीत दिलेल्या कोळीगीतांची खासियत म्हणजे ती भावप्रवाही आहेत. या गीतांचं संगीत शब्दांबरोबर अलगद पुढे जातं, वाऱ्याने समुद्राच्या पाण्यात अलगद लाटा उठाव्यात तसं. आता हेच गाणं बघा-

माज्या सारंगा, राजा सारंगा

डोलकरा रं धाकल्या दीरा र

चल जांवया घरा !

मासेमारीसाठी होडी समुद्रात लोटलेली आहे, परंतु मध्येच तुफान सुरू झाल्यामुळे सारंगाबरोबर गेलेली स्त्री सैरभैर झालीय. ती त्याला होडी पुन्हा किनाऱ्याकडे वळवायला सांगत आहे. तिची आर्जवं, तिच्या मनातील कालवाकालव सगळं शांताबाईंनी किती सहज शब्दांत पकडलंय नि बाळनेही त्याला तसंच संगीत दिलंय.

'माज्या सारंगा, राजा सारंगा' गीतांत नाजुकशी हुरहुर आहे. समुद्रात आलेल्या उधाणाने स्त्री घाबरुन गेली आहे. परंतु या गीतातील आशयाच्या नेमका उलट आशय असलेलं गीतही शांताबाईंनी लिहिलंय. तिथेही वादळंवारं सुटलेलं आहे आणि नाखवाने होडीला पाण्यात लोटलेलं आहे. पण तिथे प्रीतीचा जल्लोष आहे. त्या गाण्यातली स्त्री जणू समुद्राच्या लाटांनाच आव्हान देत आहे, कारण तिचा तिच्या सजणावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच ती दुःखाने नाही, तर आनंदाने म्हणते -

वादळ वारं सुटलं गं

वाऱ्याला तुफान उठलं गं

भिरभिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात

सजनानं होडीला पाण्यात लोटलं

वादळ वारं सुटलं गं...

वेगळ्या बाजाची ही कोळीगीतं गाताना आणि नंतर ऐकतानाही मजा आली, अजून येते. किती वर्षं झाली या गीतांना! पण आजही ती कानावर पडली, तरी मन -कोळीवाड्यात फिरुन येतं. कारण कोळीबांधवांच्या भावनाच तर, शांताबाईंनी नेमक्या पकडल्या होत्या, शब्दांत!



As received on whatsapp.

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...