Skip to main content

गगनजाई

#गगनजाई...
🌸🌸🌸

जाईच्या फुलांसारख्या पांढ-या रंगांची आणि जाईपेक्षा अधिक सुगंधी अशी ही आकाशाकडे झेपावणारी झाडं  म्हणून त्यांचं नाव #गगनजाई.निंबाच्या पानांसारखी पानं म्हणून दुसरं नाव #आकाशनिंब.तर याच्या खोडापासून काचेच्या बाटल्यांची बुचं बनवतात म्हणून तिसरं अगदी अरसिक आणि जास्त वापरातलं नाव म्हणजे #बुचाचं झाड.🙄लहानपणी घरापासून शाळेत जाताना वाटेत या फुलांचा सडा पडलेला असायचा.आम्हा मैत्रिणींच्यात का कोण जाणे पण या फुलांना पाटलिणीची फुलं असं नाव होतं.कदाचित त्या झाडांची मालकीण कोणीतरी पाटील आडनावाची बाई असावी.सकाळी सकाळी रस्त्यावरुन चालताना या फुलांचा सुगंध दरवळत नाकाशी आला की आपसुकच दोन्ही मुठीत मावतील इतकी फुलं गोळा करायची.सुट्टीच्या दिवशी वेचून घरी नेली की आई बोटांवर वळून त्याची छान वेणी करायची.इतर दिवशी शाळेत मैत्रीणींना वाटायची.त्याचे छोटे छोटे गुच्छ करुन वेणीत घालायचे.दुपारनंतर ती फुलं मऊ व्हायची.मग अलगद केसातून काढून पुढचा उद्योग सुरु व्हायचा.या पांढ-या शुभ्र किंवा किंचित गुलाबी छटा असलेल्या फुलांना पाच पाकळ्या असायच्या.तीन पाकळ्या स्वतंत्र तर चौथी आणि पाचवी एकमेकींना जुळ्या बहिणींसारख्या चिकटलेल्या. सकाळी ताठरलेल्या पाकळ्या दुपारनंतर मऊ झाल्या की नख लावून वेगळ्या करायच्या.मग अंगठा आणि तर्जनी यांच्या चिमटीत धरुन हळूवार दाबल्या की त्याला मधोमध पोकळी तयार व्हायची.ओठांच्या चिमटीत धरुन मग फुगा फुगवल्यासारखी पाकळी फुगवायची आणि दुस-या  हाताच्या तळव्यावर "टिच" करुन फोडायची.प्रत्येक पाकळी फुगवून फोडताना तो "टक" आवाज व्हायचा ना त्याचीच आम्हाला गंमत वाटायची.मधल्या सुट्टीनंतर बाई वर्गावर येईपर्यंत हे टिकटिक सुरु असायचं.आताच्या मुलांना ही फुलं माहित असतील की नाही कोण जाणे. त्यामुळे या असल्या गंमतीजंमती माहित असण्याची शक्यता कमीच आहे.आकाशनिंब हा मूळचा ब्रम्हदेश आणि मलेशियातील वृक्ष आहे.या झाडाला भारतातील हवामान चांगलंच मानवल्यामुळे आता भारतातही हा आढळतो.तरीही पूर्वी सर्रास रस्त्याच्या कडेला झाडं दिसायची तशी आता दिसत नाहीत.आकाशाला गवसणी घालण्याचं वेड त्याला मुळातच असावं त्यामुळे तो ८० ते ९० फूट इतका उंच वाढतो.याची मुळं खोलवर न जाता जमिनीत वरवरच पसरलेली असतात त्यामुळे जोराच्या वा-यात झाड उन्मळून पडण्याचा धोका असतो.याच्या मुळावरच छोटी छोटी रोपं उगवतात.ती काढून दुसरीकडे लावून नविन झाड तयार करता येतं.तसंच याला बारीक, चपट्या शेंगा येतात त्यातील बिया पक्ष्यांमार्फत इकडून तिकडे जाऊनही बीजप्रसार होतो.या झाडाला पहिली पानं गळत असतानाच पुढची पानं येत असतात.त्यामुळे ते कधीच निष्पर्ण दिसत नाही.याचं लाकूड मृदंग,पखवाज, संवादिनीचे स्वर व इतर वाद्यांसाठीही वापरतात.एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर अशी दोनवेळा ही झाडं बहरतात आणि पांढ-या शुभ्र फुलांचे घोसच्या घोस झुंबरांसारखे लटकताना दिसतात.झाडाखाली फुलांचा सडा आणि आजूबाजूला मंद सुगंध पसरलेला असतो. लटक चमेली,गगन मल्लिगे,बिरटू,Tree Jasmine, Indian Cork tree, आणि लॅटीनमध्ये Millingtonia Hortensis अशी नावं असणा-या झाडाला मराठीतली आकाशनिंब,गरूडलिंब किंवा गगनजाई ही नावंच योग्य वाटतात.

#स्वाती_जोशी_रत्नागिरी.
दि.५ डिसेंबर,२०२०.
PC - #गूगलबाबा.

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...